मराठीतील ज्येष्ठ गझलकार कै. सुरेश भट जन्म : ई.स. १९३२ मृत्यू : ई.स. २००३ ह्यांच्यानंतरच्या पिढीतील एक महत्वाचे गझलकार श्रीकृष्ण राऊत जन्म : ई.स. १९५५ हे होत ते एम. कॉम., एम. फिल. असून विदर्भातील अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. मराठी भाषा व साहित्य ह्या दोहोंच्या आवडीमधून त्यांनी एम्. ए. (मराठी) केले असून ते नुकतेच पीएच.डी ही झाले आहेत. राऊतांनी कविता, कथा, एकांकिका, समीक्षण आदी स्वरुपातील विपुल लेखन केलेले असून ह्या लेखनाला ‘कविता-रती’, ‘अनुष्टुभ्’, ‘साधना’, ‘अक्षर’, ‘हंस’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘मौज’, ‘अस्मितादर्श’, ‘प्रतिष्ठान’, ‘युगवाणी’ आदी प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिद्धी मिळालेली आहे. शिवाय चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी, घ्वनीफिती आदी प्रसार माध्यमांमधूनही प्रसिद्धी मिळालेली आहे. विपुल आणि विविध लेखनाबद्दल राऊतांना आजपर्यंत अनेक मान-सन्मान प्राप्त झालेले आहेत.
राऊत हे प्रामुख्याने कवी म्हणून, गीतकार म्हणून, विशेषतः गझलकार म्हणून मराठी रसिकांना सुपरिचित आहेत. ‘गुलाल’ (१९८९), ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्या तान्ह्या मुला’ (२००१), ‘गुलाल आणि इतर गझला’ (२००३), ‘चार ओळी तुझ्यासाठी’ (२००३), हे चार काव्यसंग्रह त्यांच्या नावावर जमा असून त्यातील पहिला व तिसरा काव्यसंग्रह संपूर्णपणे गझलांचा आहे. ‘मेळघाटच्या कविता’ हा त्यांचा कोरकू आदिवासींच्या जीवनानुभवाला अभिव्यक्ती देणारा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अशा राऊतांची गझलकार म्हणून प्रथम ओळख महाराष्ट्राला झाली ती १९८१ मध्ये प्रदीप गुजर संपादित ‘कविता’ ह्या गाजलेल्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहामधून. ह्या संग्रहात राऊतांच्या चार गझला समाविष्ट आहेत. ही ओळख अधिक ठसठशीत करण्याचे काम ‘काफला’ (१९९०), ‘गझलधारा’ (१९९४), ‘कारवा’ (२०००) व विदर्भाची मराठी गजल (२००४) ह्या चार प्रातिनिधिक मराठी गझलसंग्रहांमधील त्यांच्या गझलांनी केले़. दरम्यानच्या मधल्या काळात एप्रिल १९८९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखन अनुदान योजनेमधून श्रीरामपूर (जि.अहमदनगर) येथील शब्दालय प्रकाशनाने राऊतांचा ‘गुलाल’हा गझलसंग्रह प्रकाशित केला. संग्रहामध्ये ५० गझला आहेत. नंतर स्वतः राऊतांनी फेब्रुवारी २००३ मध्ये ‘गुलाल आणि इतर गझला’ हा आपला दुसरा गझलसंग्रह प्रकाशित केला. ह्या संग्रहामध्ये आधीच्या ‘गुलाल’ ह्या संग्रहामधील ५० गझला तर आहेतच, शिवाय नव्या अशा १९ गझलाही आहेत. तसेच संग्रहाच्या मलपृष्ठावर ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्या तान्ह्मा मुला’ ह्या काव्यसंग्रहातील ‘भाई’ ह्या शीर्षकाची गझलही उद्धृत करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे नव्या-जुन्या अशा सर्व मिळून राऊतांच्या संग्रहबद्ध गझलांची संख्या ७० भरते. श्रीकृष्ण राऊत ह्यांची गझल जाणून घ्यायची ती ह्या संग्रहबद्ध ७० गझलांवरुनच.
राऊतांची गझल ही गझलवृत्त व गझलवृत्ती ह्या दोहोंच्या बाबतीतले समाधान खूप देऊन जाणारी आहे. ती पुष्कळशी निर्दोष आहे. तिच्यात विपुलता व विविधता लक्षणीय आहे. वृत्तयोजनेच्या बाबतीत तपशील द्यावयाचा झाला, तर ७० गझलांपैकी ६६ गझला ह्या अक्षरगणवृत्तांमधील आहेत आणि उर्वरित ४ गझला ह्या मात्रावृत्तांमधील आहेत. आनंदकंद ह्या लोकप्रिय अक्षरगणवृत्तामध्ये २९ गझला आहेत, वियद्गंगा व स्त्रग्विणी ह्या अक्षरगणवृत्तांमध्ये प्रत्येकी ७-७ गझला आहेत, देवप्रिया ह्या अक्षरगणवृत्तांमध्ये ४, भुजंगप्रयात व देवराज अक्षरगणवृत्तांमध्ये प्रत्येकी ३-३, तर सुकामिनी, ह्या अक्षरगणवृत्तामध्ये २ गझला आहेत बाकीच्या ११ अक्षरगणवृत्तांमध्ये प्रत्येकी एकेक गझल आहे, ही सर्व वृत्तयोजना निर्दोष, तंत्रशुध्द, सफाईदार, सहजोस्फूर्त जाणवते. क्वचित काही ठिकाणी एका गुरू अक्षराऐवजी दोन लघू अक्षरे वापरण्याची सवलत घेतलेली आढळते. तसेच अगदी तसेच अगदी थोड्या ठिकाणी वृत्तपूर्तीसाठी मधुर, चतुर, झिंगुनी, बुध्दीबळास, नाजूक असे अशुध्द शब्द वापरलेले आढळतात. सोमराजी, आनंद, मनोहरा ही अत्यंत छोटी व दुर्मिळ अक्षरगणवृत्ते राऊतांनी सफाईदारपणे हाताळली आहेत. नमुन्यादाखल सोमराजी ह्या अक्षरगण-वृत्तामधील पुजारी (पृ. ५३) ही गझल पाहण्याजोगी आहे ह्या गझलेतील पहिल्या तीन द्विपदी अशा आहेत :
कशी वेळ आली
क्षमा क्रूर झाली!
हसे आज कुंकू
गमावून लाली
करा बंद वर्षा;
पिके तर जळाली
राऊतांची गझल ही आत्मचिंतनपर, सामाजिक व प्रेमविषयक अशा तीन प्रकारचा अशय मोठ्या प्रमाणात व्यक्त करणारी आहे ह्या गझलेच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने मी आढळतो. हा मी बर्याच प्रमाणात जगाकडून दुखावला गेलेला, तरीही रडत-कुढत न राहणारा, जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीशी सतत झुंज देत जगणारा आहे. नमुन्यादाखल काही द्विपदी पाहू :
माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता
(गुलाल, पृ. १२)
हासतो जरी सुरात मी;
घाव झाकतो उरात मी
(सोबती, पृ. १५)
आत्मकेंद्र फार झाले खानदानी आरसे;
त्यात नाही स्पष्ट आता दुःख झाले फारसे
(तेरवी, पृ. १९)
जीवना रे मला त्रास ह्याचाच की;
कोणताही तुझा त्रास नाही खरा
(घास, पृ. २३)
निखार्यातून दुःखाच्या सुखाने चालतो आता;
हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता
(मदिरा, पृ. २८)
तुला सांग दुःखा कसा मित्र मानू ?
हवे तेवढे तू न आघात केले़
(हात, पृ. २३)
हुंदक्याचे फूल काढी अंतरंगी स्वस्तिके;
आज दिंडी आसवांची येत आहे लोचना
(दिंडी, पृ. ३९)
उभी जिन्दगानी पहाडाप्रमाणे;
तिला लोटतो मी कवाडाप्रमाणे
(फूल, पृ. ७५)
राऊतांची गझल सामाजिक आशय व्यक्त करताना उपहास, उपरोध ह्या अस्त्रांचा मार्मिक उपयोग करते. ती नेमकेपणाने वर्मावर बोट ठेवते, नव्हे, घाव घालते. त्यातून जे सामाजिक वास्तव उघडे होते, ते मनाला क्लेशदायक असते. गझलकाराने जणू आपल्या मनातीलच बोलून दाखवले आहे, असे रसिकाला वाटत राहते ह्या सर्व दृष्टीने काही प्रातिनिधिक ठरतील अशा द्विपदी पुढीलप्रमाणे:
दिसते जरी तुम्हाला ही फार छान वस्ती;
सेंटेड माणसांची भलतीच घाण वस्ती
(वस्ती, पृ. २२)
टाळा हुशार पाणी बेटे सनातनी ते;
चवदार ह्या तळ्याला राखा असेच राखा
(पहाट, पृ. ३४)
मांजरीने कुण्या शाप ह्यांना दिला?
एकमेकास हे बोखरु लागले
(वाढ, पृ. ३६)
हुंकार देत आहे काळोख भोवताली;
सांभाळ रे दिव्या तू रंगीत रोषणाई!
(अनुवाद, पृ. ३८)
जखमेस न्याय आता सांगा कसा मिळावा?
सामील रक्त झाले निर्ढावल्या सुर्याला!
(सामील, पृ. ४०)
नावा किती बुडाल्या त्याचा हिशेब नाही ;
पण दीपस्तंभ सारे सागर तरुन गेले़
(लकवा, पृ. ४६)
फाटून नष्ट झाला मागे कधीच झेंडा
हा उंच भीकमाग्या नुसताच हात आहे
(झेंडा, पृ. ४९)
घाऊक आजचा हा बाजारभाव ताजा
स्वस्तात रक्त मिळते भाकर महाग आहे!
(डाग, पृ. ५०)
खुनी देव झाले ;
पुजारी मावाली!
(पुजारी, पृ. ५३)
ज्यांना तहान त्यांना पाणी न पाजतो;
देवास घालतो पण आभषेक भामटा
(भामटा, पृ. ७२)
मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी;
खिशाच्या आत घालुनी विठू नेतात मंबाजी
(मंबाजी, पृ. ७४)
राऊतांची गझल प्रेमविषयक आशय व्यक्त करताना प्रेमभावनेच्या विविध छटा समर्थपणे व सौंदर्यपूर्ण वृत्तीने रसिकांसमोर आणते. आषाढ ( पृ. १३), रासलीला (पृ. ३०), निखारे (पृ. ४३) व बिंब (पृ. ५५) ह्या चार गझलांचा मात्र वेगळा विचार करावा लागेल. कारण ह्या चारही गझलांचे स्वरुप गझलेच्या आकृतिबंधातील नाट्यगीत असे आहे. गझल हा आत्मनिष्ठ काव्यप्रकार आहे. त्याद्वारे स्वतःच्या भावभावना, चिंतन व्यक्त व्हावे, अशी अपेक्षा असते. कवी जेव्हा परचित्तप्रवेश करुन दुसर्याच्या भावभावना, चिंतन व्यक्त करतो; तेव्हा त्यांच्या कवितेचे स्वरुप नाट्यगीत असे बनते. राऊतांनी उपरोक्त चार तथाकथित गझलांमधून परचित्तप्रवेश करुन प्रेयसीच्या भावभावना, चिंतन तिच्याच शब्दांमधून व्यक्त केलेले आहे. सुरेश भटांच्या रुपगंधा (१९६१) ह्या काव्यसंग्रहामध्ये रुपगंधा (पृ. १) ही एक गझल; रंग माझा वेगळा (१९७४) ह्या काव्यसंग्रहातील माझी उदास गीते (पृ. ३२), तरुण आहे रात्र अजुनी (पृ. ६१) ह्या दोन गझला, एल्गार (१९८३) ह्या काव्यसंग्रहातील एकटी (पृ. २२), भल्या पहाटे निघून आले (पृ. २८) व सुन्या मैफलीत (पृ. ८२) ह्या तीन गझला ह्याच कारणाने खर्या अर्थाने गझला न ठरता, गझलेच्या आकृतिबंधातील नाट्यगीते ठरतात. मात्र एक कविता म्हणून, नाट्यगीत म्हणून भटांच्या व राऊतांच्याही ह्या तथाकथित गझला उत्कृष्ट आहेत, ह्यात दुमत असण्याचे काही कारण नाही. राऊतांच्या सावळी (पृ. ८०) ह्या प्रेमविषयक गझलेबद्दल एक तक्रार अशी की, ह्या गझलेतील बर्याचशा द्विपदी ह्या नेहमीच्या भावकवितेप्रमाणे - भावगीताप्रमाणे सरळ, सपाट व उलगडत जाणार्या अशा आहेत. अन्य प्रेमविषयक गझला व प्रेमविषयक द्विपदी मात्र गझलवृत्त व गझलवृत्ती ह्या दोहोंना पूर्ण न्याय देणार्या आहेत. काही प्रभावी द्विपदी अशाः
सांगतो मी खरे, फार झाले बरे, फक्त तुझा चेहरा पाहिला
(चेहरा, पृ. ४७)
वळणावरून तूही जाशील दूर राणी;
होईल फूल माझे निर्माल्य त्या ठिकाणी
(राख, पृ. ५१)
कुंतलात गुंतता अखेर हीच जाण ये-
कापणार ना गळ्यास तोच केस चांगला
(जाण, पृ. ७०)
तुझा हात साधा न हातात माझ्या;
मला भेटली तू घबाडाप्रमाणे
(फूल, पृ. ७५)
माझियाऐवजी ओठ ज्या चुंबिती;
त्या बटांना गडे दूर सारू नको
(डाव, पृ. ७७)
आज काळास हे काय झाले असे;
संपली रात्र माझी पळासारखी
(पारदर्शी, पृ. ७८)
लाव छातीस तू कान देवा जरा;
ऐक माझ्या उरी सावळी सावळी
(सावळी, पृ. ८०)
श्रीकृष्ण राऊतांची गझल प्रभावी पद्धतीने जीवनभाष्य करणारी, ती जगण्याची उमेद वाढवणारी आहे. तिच्यामध्ये परिणामकारक उपदेशात्मकता आहे. ह्या सर्व संदर्भातील नमुने म्हणता येतील, अशा काही द्विपदी पुढीलप्रमाणे-
चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा;
चालेल जीव गेला, शाबूत नाक ठेवा
(काटे, पृ. १७)
माणूस तू कसा रे खातोस शेण वेड्या;
इतका नको पडू तू सांभाळ तोल काही
(तोल, पृ. २४)
नव्या या उंबर्यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे;
कुणी हे लावले आहे इथे रॉकेल मापाला?
(कोळसा, पृ. २६)
पोथीत पेरती हे संदेश लाचखाऊ;
आत्म्यास राहण्याचे हे मागतात भाडे
(प्रचिती, पृ. २७)
काढा उपाय काही शोधून यार आधी;
किंवा खुशाल तोडा हे बंद दार आधी
(प्रसंग, पृ. ३१)
जमलेच तर तुला तू घ्यावा वसा सतीचा;
पोथी तशी कुणीही घेते छिनाल हाती
(वसा, पृ. ४८)
सरावा जन्म हा सारा अशा कैफात स्वानंदी;
निरागस लेकरू तान्हे जसे झोपेत हासावे
(कायदा, पृ. ५८)
सोबतीचे जरी सर्व झाले पशू;
तू तरी वाग ना माणसासाखा!
(सर्व, पृ. ६२)
वेडेपण हे करु नको;
विस्तव हाती धरु नको
(पर्याय, पृ. ६८)
ऐकवू नकोस तू तुझी नवी नवी गझल;
भोवताल मंडळी इथे महान चोरटी
(भोवताल, पृ. ७१)
तुकारामा, अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा;
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी
(मंबाजी, पृ. ७४)
लाख होउ दे सभोवताली उजाड बागबगीचे;
गाव फुलांचे मनात हसर्या अमुच्या वसते भाई
(भाई, पृ. मलपृष्ठ)
श्रीकृष्ण राऊतांच्या गझलेत बोलीभाषेतील सहजता, प्रासदिकता, संवादात्मकता, गोडवा हे गुण ओतप्रोत आहेत. मात्र काही अल्प स्थळे अशी आहेत की, ज्या ठिकाणी अपरिचित शब्दांमुळे अर्थहानी होण्याचा धोका संभवतो. प्रचिती (पृ. २७) ह्या गझलेतील नवाडे हा शब्द, देव (पृ. ४५) ह्या गझलेतील भुजून हा शब्द, जाण (पृ. ७०) ह्या गझलेतील घापला हा शब्द व शुभेच्छा (पृ. ७९) ह्या गझलेतील नवाई हा शब्द ही ती अल्पस्थळे होत. राऊतांनी आपल्या गझलांना शीर्षके देताना शेवटच्या द्विपदीतील एखादा शब्द निवडून तो शीर्षक म्हणून योजलेला आहे. (अपवाद : पारदर्शी ही गझल) ही शीर्षके आटोपशीर आहेत मात्र ती समर्पक वाटत नाहीत. अर्थात् हा दोष राऊतांचा कमी व गझल ह्या काव्यप्रकाराचा अधिक, असे म्हणावे लागते. कारण नेहमीच्या कवितेत पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत जो आशय आलेला असतो, तो एकाच विषयाला धरून आलेला असतो. त्यामुळे अशा ठिकाणी समर्पक शीर्षक निश्चित करता येते. गझलेत मात्र एकच एक विषय सर्व द्विपदींमधून हाताळलेला असतोच, असे नाही. म्हणून गझलेला शीर्षक देण्याच्या फंदातच पडू नये, असा एक मतप्रवाह आहे. मात्र शीर्षकामुळे काही एक सोय होत असते, हे नाकारता येत नाही.
थोडक्यात, श्रीकृष्ण राऊत ह्यांची गझल ही तंत्रशुध्द आणि अस्सल मराठमोळ्या मराठी गझलेचा जिताजागता नमुना आहे. विदर्भाने मराठी गझलसृष्टीला अमृतराय, उ. रा. गिरी, सुरेश भट ह्यांच्यासारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ गझलकार दिले; डॉ. राम पंडितांसारखे तळमळीचे गझल अभ्यासक दिले़. श्रीकृष्ण राऊत हे ह्याच विदर्भातील आहेत आणि ते विदर्भाची ही उज्वल परंपरा पुढे नेतील, इतकेच नव्हे तर ही परंपरा अजून अधिक उज्ज्वल करतील असा भरंवसा त्यांच्या गझलेतून मिळत राहतो. त्यांच्या गझलेचे स्वागत सुरेश भट, वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर अशा अनेक दर्दी ज्येष्ठांनी केलेले आहे. समस्त गझलप्रेमींनी तर केलेले आहेच. नुकतीच वयाची पन्नाशी पूर्ण केलेल्या राऊतांची भावी गझल त्यांच्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे दिवसेंदिवस अधिकाधिक परिपक्व, प्रगल्भ होत जाईल, असा विश्वास त्यांच्या विद्यमान गझलेमधून मिळत राहतो, ह्यातच सर्व काही आले!
संदर्भ आणि टीपा :
गुजर प्रदीप मुरलीधर (संपा), कविता (प्रतिनिधिक काव्यसंग्रह), प्रकाशक स्वतः संपादक, ठाणे, प्रथमावृत्ती : मार्च १९८१, पृ. ६
भट सुरेश व कांबळे (सांगोलेकर) अविनाश (संपा) काफला (प्रातिनिधिक मराठी गझलसंग्रह), कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे प्रथमावृत्ती : ऑगस्ट १९९०, पृ. १०१ व १०२
कांबळे (सांगोलेकर) अविनाश (संपा) गझलधारा (प्रतिनिधिक मराठी गझलसंग्रह), कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे प्रथमावृत्ती :१९९४, पृ. ७८
पांचाळे भीमराव व इतर (संपा) कारवा (प्रतिनिधिक मराठी गझलसंग्रह), गजलसागर प्रतिष्ठान, मुंबई, प्रथमावृत्ती : २ डिसेंबर २०००, पृ. १३३
पंडित राम व पांचाळे भीमराव (संपा) विदर्भाची मराठीगझल (प्रतिनिधिक मराठी गझलसंग्रह), गजलसागर प्रतिष्ठान, मुंबई, प्रथमावृत्ती : ७ फेब्रुवारी २००४, पृ. १३० व १३१
प्रस्तुत शोधनिबंधात राऊतांच्या गझलांचे पृष्ठांक नमूद करणार आहे ते गुलाल आणि इतर गझला (फेब्रुवारी २००३) ह्या संग्रहामधील.
गझलकार श्रीकृष्ण राऊत हे स्वतः शारीरिकदृष्ट्या काहीसे अपंग आहेत. शिवाय गुलाल व गुलाल आणि इतर गझला ह्या दोन्ही गझलसंग्रहांना त्यांनी जी अर्पणपत्रिका जोडलेली आहे, तीत त्यांनी जीवनाशी सतत झुंज देत जगणार्या जगातल्या तमाम अपंगांच्या जिद्दीला, अशा शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त केलेली आहे.
पुणे येथे ३० ऑगस्ट १९८७ रोजी मी स्वतः भटांना समक्ष भेटलो असता त्यांना मी एकटी, भल्या पहाटे निघून आले व सुन्या सुन्या मैफलीत ह्या तुमच्या गझला खर्या अर्थाने गझला नाहीत, तर गझलेच्या आकृतिबंधातील नाट्यगीते होत, असे म्हटले असता ते त्यांनी मान्य केले होते.
-डॉ. अविनाश सांगोलेकर
प्रपाठक व मराठी विभागप्रमुख
पुणे विद्यापीठ, पुणे
भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२
(‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ अंक ३२३/ऑक्टोबर ते डिसेंबर, २००७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा